
(Baluchya Avasthantarachi Diary)
लेखक : किरण गुरव
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
किरण गुरव यांची कथा ही केवळ 'बाळूच्या अवस्थांतराची डायरी' नाही. हा आजच्या काळाच्या अवस्थांतराचाच कोलाज आहे. वास्तव आणि कल्पिताच्या अजोड सरमिसळीतून ही कथा साकारते. त्यामुळे घटना-घटितांचे प्रतिबिंब एवढ्यापुरतीच ती मर्यादित राहात नाही. तुकड्या-तुकड्यात दुभंगलेल्या, चिरफाळलेल्या पुढ्यातल्या वास्तवाला गुरव यांची कथा विलक्षण भाषासामर्थ्याने चिमटीत पकडते. गरगरून टाकणारी गतिमानता आणि बहुपदरी आशयसूत्रे यामुळे नागर-अनागर अशा सीमारेषाही या कथेत पुसट होतात. बदलत्या सामाजिक धारणा, कोसळती मूल्यव्यवस्था, माणसाचेही 'क्रयवस्तु'करण तेजीत आणणारा सर्वसंचारी बाजार अशा असंख्य वावी गुरव यांच्या कथेत सघन तपशिलांसह दीर्घपटलावर सामावतात आणि कथा ही स्थळ-काळाला बांधून टाकणारी कला आहे याचा प्रत्यय येतो. संवेदनेशिवायचे कृतक् जग निर्जीव शब्दांच्या सांगाड्यातून रचण्यालाच कथा म्हणून खपविण्याच्या सराईतपणापासून ही कथा अलिप्त आहेच, अवकाश भरून काढण्यासाठी सरधोपट वास्तववादाचा अ-कलात्म अवलंब करण्याची लागणही या कथेला झाली नाही. रंजनप्रधान चटपटीत शैली आणि वाचकानुनयाच्या सापळ्यातून मराठी कथेला मुक्त करून थेट जीवनदर्शनाच्या पातळीवर आणणारे जे आजचे कथाकार आहेत त्यात किरण गुरव हे महत्त्वाचे नाव आहे, हे याही कथासंग्रहातून ठळक होईल!
- आसाराम लोमटे
MRP ₹250 ₹225 (10% Discount)